anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

8.29.2009

दिवस नेमका कधी सुरु होतो आणि कधी संपतो?

नाही हा प्रश्न वाचून तुम्हाला मी खुळा आहे अस वाटेल कदाचीत! परंतु खरच हल्ली मला हा प्रश्न वरचेवर सतावायला लागलाय. जेव्हा जेव्हा मी रेलवे तिकीट काढायला जातो तेव्हा तेव्हा तर माझ्या विचारांची गाडी हटकून या प्रश्नाशी येउन थांबते.

आता बघा, शनिवारी रात्री, म्हणजे २९ ऑगस्ट च्या रात्री १२:३० ला पुण्याला गाडीत बसायचे असेल तर तिकिट काढताना कुठल्या तारखेचे काढाल? २९ तारीख टाकाल का? टाकलीत तर फसाल कारण रात्री १२ नंतर तारीख बदलते. म्हणजे अगदी विरोधाभासी वाक्यात सांगायचे तर "रात्री १२ नंतर दिवस बदलतो!" आहे की नाही अचंबीत करणारी गोष्ट?

म्हणजे दिवस आणि रात्र या शब्दांना अर्थच नाही? भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट आहे, ध्वजारोहण वगैरे कार्यक्रम सकाळी किंवा दिवसा ७ वाजता होतात. पण तरी सुद्धा नेहरूंनी केलेले भाषण हे शेवटी १४ ऑगस्टच्या रात्री १२ वाजताच केले होते ना?

आपण इंग्रजांकडून ब-याच गोष्टी जशाच्या तशा उचलल्या, ही त्यातलीच एक.खर म्हणजे रात्री १२ वाजता नवा दिवस सुरु होणार ही कल्पना कोणाची हे शोधून काढणे रंजक ठरेल. कारण भारतीय इतिहासात अशी नोंद असण कठीण आहे. ज्या संस्कृतीने सूर्याला "मीत्र" म्हंटलय ती संस्कृती त्याच्या आगमनानेच नवीन दिवसाचा प्रारंभ करणारी असली पाहीजे, त्याची पाठ वळताच दिवसाचा शुभारंभ करणारी नव्हे!

पण माझ्या मते आपण उप-यांकडून आपल्याला सोयीच्या ठरतील अशाच गोष्टी उचलल्या, चांगल्या असल्या तरी परंतु गैरसोईच्या ठरतील अश्या चांगल्या सवयी मात्र घेतल्या नाहीत. जर नवा दिवस पहाटे ५:३० ला सुरु झाला तर लवकर उठावे लागेल, नवीन वर्षाच्या स्वागताला मद्यधुंद होवुन पहाटे ५:३० ला उठणे केवळ अशक्य! त्यापेक्षा १२ पर्यंत धुंद होवुन नवा दिवस सुरु झाला म्हणत १०-१२ तास झोपणे सहज शक्य!

ह्या सर्व विचार मंथनाचा उद्देश असा कि मी आजही वाट बघतोय अशा एका बापुड्याची ज्याला दिवसाचे उत्साहाने स्वागत करणे म्हणजे काय हे कळलेय आणि जो माझ्या येत्या वाढदिवशी मला रात्री १२ ला झोपेतून उठवून ’हॅपी बर्थडे’ न म्हणता सकाळी ५:३०-६:०० ला ’गूड मॉर्निंग’ म्हणत ’हॅपी बर्थडे’ म्हणेल याची.

8.23.2009

घामाचा वास किती लोकांना आवडतो?

बस, लोकल अथवा कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी सर्वात प्रकर्षाने जाणवणारा गंध म्हणजे घामाचा गंध! आणि हल्लीच्या टापटिपीनी राहाणा-या जगात या वासाला काहीच किंमत नाही. किंबहूना ’अंगाला घामाचा वास येणे’ हा एक कुचेष्टेचा विषय झालाय.

पण भारतासारख्या भौगोलीक पार्श्वभुमी लाभलेल्या देशात घाम हा येणारच! अगदी खर सांगायच तर ’घाम’ आणि ’भारतीय संस्कृती’ यांच एक अतूट नात आहे अस मला वाटत.लहानपणी ’स्कॉलरशीप’ च्या अभ्यासात मराठी म्हणी, वाक्प्रचार यांचा अभ्यास करावा लागायचा. तेव्हा ’घामाचा पैसा’, ’घाम गाळणे’, ’घाम फुटणे’, ’घामाने शिंपणे’ असे अनेक वाक्प्रचार माहित झाले. पण त्यांचा अर्थ कळायला वेळ लागला.

आता विचार करताना मला लहानपणी आई-वडीलांनी दिवसभर बाहेर कामावर राबून परत आल्यानंतर प्रेमाने पोटाशी धरलेले, कुशीत घेतलेले दिवस आठवतात. तेव्हा येणारा घामाचा वास अजुनही माझ्या लक्षात आहे. तेव्हा कळण्याच वय नव्हत पण आता समजत की तो घाम त्यांनी आपल्या पोरांच्या उज्वल भविष्यासाठी आटवलेल्या रक्ताच बाय-प्रॉडक्ट होता...पहिल्या पावसानंतर दरवळणारा मृदगंध पुढे येणा-या ’सोनियाच्या पीकाची नांदी’ असतो त्याचप्रमाणे आई-वडिलांनी गाळलेला घाम हा पुढे चालून मुलांच्या आयुष्यात ’सोनियाचे दिन’ यावेत यासाठी असतो.

माझे हे विचार हल्लीच्या ’डी-ओडोरंट’ च्या जमान्यात हास्यास्पद ठरण्याचाच संभव जास्त आहे. परंतु घामाच्या वासाला नाक मुरडणा-या लोकांपाशी माझी एकच विनंती आहे, कधीतरी मनापासून झटून एखाद्या गोष्टीसाठी घाम गाळा. त्या घामाचा वास तुम्हाला नाही आवडला तरी तुमच्या कामामुळे ज्याच भल झालय त्याला विचारा, त्याला हा ’घामाचा वास’ अत्तरापेक्षाही सुगंधी वाटेल.

आणि शेवटी ’दाम करी काम’ ऐवजी ’घाम करी काम’ झाल्यास या देशाचेही भले होईल .. !