Name:
Location: Pune, Maharashtra, India

5.12.2006

"याचा भाव किती असेल?" हे वाक्य ऐकल रे ऐकल की अंगाला दरदरून घाम फ़ुटतो माझ्या!आणि त्यात जर हे वाक्य एखाद्या स्त्रीच्या तोंडून बाहेर पडले तर संपलच!"तुम्ही जो भाव सांगाल भागीले दोन वजा दहा रुपये" हे सुत्र आयुष्यभर लक्षात ठेवण्यातच खरा पुरुषार्थ आहे!

"कानातली कितीला घेतली?" याचे उत्तर भारीतली दिसताहेत अस समजून "२५ रुपये" अस दिल्यावर जर "१० रुपयात अश्या ३ जोड्या" हे मिळत असेल तर शहाणा मनुष्य काय करेल?पुढच्या वेळी "अरे व्वा, ५ रुपयाची वस्तू सुद्धा किती चोखंदळपणे निवडता ग तुम्ही बायका! काय सौंदर्यद्रुष्टी असते बायकांची! आपल्याला नाही बुवा जमायच!" असा हुकमी संवाद टाकला रे टाकला की "काय हे! पुरुषांना काडीची अक्कल नसते खरेदीची! येवढी ५०० रुपयांची कानातली आणली तर त्याची तुलना ५ रुपयाच्या त्या फत्र्या कानातल्याशी करावी? तरी बर, १०००च म्हणत होता मेला, कस बस त्याला ५०० रुपयात गप्प केल!"हेच उत्तर ऐकु येणार!

भाजीला गेल्यावरसुद्धा हाच अनुभव! "कोथिंबीर काय भाव?" च उत्तर "३ रुपयाला जुडी" अस आल की शहाणा मनुष्य पुढच्या भाजीवाल्याकडे जातो. आणि "एखादी रणचंडीका शत्रुच्या छाताडावर तलवारीच टोक ठेवुन ज्या विजयी अविर्भावाने जगाकडे द्रुष्टी टाकेल" तश्या नजरेने "५ रुपयात ३ जुड्या ( व सोबत कढिलिंब मिरच्या त्या वेगळ्याच!)" घेउन आलेली स्त्री आपल्याला खिजवत निघून जाते!

या युगानुयुगे उगाळल्या गेलेल्या गोष्टीवर मी आज परत भाष्य करण्याची गरजच काय?गरज आहे! आजचा दिवस "सोनियाचा दिन" आहे!(सोनिया गांधी चार लाख मतानी निवडणूक जिंकली म्हणून म्हणत नाहीये मी!)
आज मी जिंकलोय!

पुस्तकांबद्दल काहीच माहिती नसलेल्या एका स्त्रीनी 'कव्हर' बघुन ९०० रुपयाला आणि माहिती असलेल्या स्त्रीने लोकप्रियता बघुन ७५० रुपयाला असेल असा अंदाज व्यक्त केलेली पुस्तके मी ६०० रुपयात घेउन आलोय!

ता.क. खर तर बाजुच्या दुकानात नंतर तीच पुस्तक ५५० रुपयात मिळाली माझ्या एका मित्राला!पण हिंदी चित्रपटातल्या सारख "ये राज राज ही रहना चाहिये मेरे दोस्त" याचा बंदोबस्त मी करून आलोय १ प्लेट भजी आणि १ कोका-कोलाच्या बदल्यात ...

1 Comments:

Blogger निखिल said...

Soniyacha divas hi koti awadali,
chal asech likhan chalu thev

2:34 PM  

Post a Comment

<< Home