anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

10.28.2006

aaj baryaach diwasaanni lihaayachaa yog aalaa!

आज माझ्या मराठी अनुदिनीत मी हे इंग्रजी-मराठी काय लिहीत सुटलोय?का 'जमाना बदल रहा है, तुम भी बदलो' या पालुपदाला मी बळी पडलोय?

वर्तमानपत्रात खून, मारामा-या, बलात्कार, राजकारण्यांच्या कोलांट्याउड्या, भारतीय क्रीकेट संघाच्या माजी कर्णधारांनी उधळलेली मुक्ताफ़ळ ( ताज उदाहरण : कपिल देवचे "सचिनने 'वेळेत' निवृत्त व्हावे" हे वाक्य! ) ह्या नेहमीच्या बातम्या सोडून जे काही उरत ते वाचण्यात मला फ़ार रस आहे! त्यामुळे माझ्या अनुदिनीतल्या ब-याचश्या प्रकरणांची सुरुवात 'आजच बातमी वाचली की ...' अशी होत असते.

तर मुळ विषयाला बगल देवुन दुसरच च-हाट लावण ह्या तमाम भारतीयांमध्ये असलेल्या गुणाच प्रदर्शन थांबवून जरा मूळ विषयाकडे वळतो.

आज वर्तमानपत्रात वाचल की आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतले ९०% कलाकार आपले हिंदी संवाद 'रोमन' मधून वाचतात. म्हणजे जस मी पहिल्या दोन ओळीत लिहीलय मराठीच, पण देवनागरी लिपी न वापरता रोमन लिपी वापरलीय तसच! एखाद्या लेखकाने चुकून देवनागरीत लिहीलेले संवाद दिल्यास "हे काय दिलय वाचायला, ईंग्रजी मध्ये आणा" असे सांगितले जाते! एकदा या प्रकाराला वैतागुन कुण्या एका लेखकाने एका प्रथितयश नटाला "तुम्ही स्वप्न कुठल्या भाषेत बघता हो?" असा प्रश्न विचारला व त्याला उत्तर मिळाले "ईंग्रजी"!

हे सगळ वाचून मला माझे बिट्स पिलानी मधले दिवस आठवले. आमचे एक "हिंदी गाण्यांच्या" कॅसेट्सची देवाण-घेवाण करणारे "झंकार" नावाचे मंडळ होते! किती नादमय नाव, कोणाला सुचल असेल बर? आमच्या 'बॅच' च्या काही मुली जेव्हा झंकारच्या काही कार्यक्रमांत सुत्र-संचालन करायला जायच्या तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या संवादाच्या चिठ्ठ्या असायच्या, आणि मला कायम या एकाच गोष्टीच आश्चर्य वाटत आल की या मुली "दर्शकोसे अनुरोध है के वो शांती बनाये रखे" हे लिहायला अत्यंत सोप असलेल आणि त्यांच्या मातृभाषेत असलेल वाक्य सुद्धा ईंग्रजी मध्ये लिहायच्या!

आपल्या देवनागरी सारख्या अत्यंत श्रीमंत लिपीतून ( २६ मुळाक्षरे असलेल्या रोमन पेक्षा देवनागरी कधीही श्रीमंतच! ) लिहिणे लोक बंद करू लागले आहेत याचे कारण काय असेल?

एस.एम.एस. व संगणक संस्कृतीमुळे ईंग्रजी मध्ये 'टाईप' करणे क्रमप्राप्त झाले आहे, आणि मग सगळ्याच मातृभाषेतल्या शब्दांना ईंग्रजीमध्ये पर्यायी शब्द मिळणे कठीण असल्यामुळे ( उदा. लोचा, राडा, शेपूची भाजी ई. ) लोकांनी या शब्दांना रोमन लिपीत तसच्या तसच लिहिण सुरु केल असल्यामुळे हा रोग बळावला असण्याची शक्यता आहे.

आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अर्धशतक होवुन गेल्यानंतरही ईंग्रजांनी "कारकून तयार करणे" या एकमेव उद्देशातून निर्माण केलेल्या शिक्षणपद्धतीला पर्यायी पद्धत अजुन आपण निर्माण करू शकलेलो नाही. त्यातून "ईंग्रजी लिहिणारा-बोलणारा माणूस म्हणजे साहेब" या गैरसमजातून लोक बाहेर यायलाच तयार नाहीत. तिकडे जपान, चीन, फ़्रांस हे देश जगाला 'तुम्हाला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर पहिले आमची भाषा शिका' असे ठणकावुन सांगत असतानाच भारत "आम्ही आमची भाषा-लिपी बासनात गुंडाळून ठेवायला तयार आहोत" अशी भुमिका घेउन उभा आहे व हे निश्चीतच खेदजनक आहे.

आज लोकांच्या तोंडात शुद्ध भाषा येण कठीण झालेल असताना त्यांनी शुद्ध भाषेत लिहाव ही अपेक्षा करण तस चूकच आहे. पण म्हणून केवळ ईंग्रजीच्या सोसापायी आपल्या सहज-सुंदर देवनागरी लिपीची वासलात लावण्यात कुठला शहाणपणा आहे? "फक्त आपणच या अधोगतीकडे जात नाहीयोत, ईंग्रजी पण इतर भाषांमधून किती शब्द उसने घेतेय ते बघ की" असे मला ब-याच लोकांनी ऐकवले आहे. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की "चड्डी" हा शब्द ईंग्रजी भाषेत गेल्यावर ते त्या शब्दाला देवनागरीत लिहीत नाहीत, तर त्यांच्याच रोमन भाषेत लिहीतात. पण एकदा वैचारीक गुलामगिरीची सवय झालेल्या लोकांना हे सगळ समजावुन सांगण्याच्या प्रयत्न केला की "गाढवापुढे वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता" ह्या म्हणीची प्रचिती येते!

10.11.2006

भारतातील संसद भवनावर हल्ला करणा-या व या गुन्ह्यात दोषी ठरून फाशीची शिक्षा झालेल्या मोहंमद अफ़जल बद्दल विविध राजकीय पुढा-यांना, विचारवंतांना आणि मानवी हक्क संघटनांना अचानक पुळका आलाय. त्यांनी उधळलेली काही मुक्ताफळे ...

रमझानच्या शेवटच्या शुक्रवारी अफजलला फ़ाशी दिल्यास राज्यातील नागरिकांना चुकीचा संदेश दिला जाईल.
-गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री, जम्मू आणि काश्मीर

महात्मा गांधींच्या या भूमीत मानवतावादी दृष्टीकोनातून अनेक निर्णय घेतले गेले आहेत. राज्यातील नागरिकांच्या भावना लक्षात घेवुन सरकारने फ़ाशीचा निर्णय पुढे ढकलावा
-मेहबुबा मुफ़्ती, पीपल्स डेमोक्रॅटीक पक्षाच्या अध्यक्षा

भगवान बुद्ध, महावीर आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या शांतिदुतांच्या देशात फ़ाशीची शिक्षा असावी का, यावर समग्र चर्चा घडवून यायला हवी. महंमद अफ़जल याला फ़ाशीऐवजी जन्मठेपच देण्यात यावी.
-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस तारीक अन्वर

अफजलला फ़ाशी देउन त्याला धर्मांधांच्या नजरेत हुतात्मा होवु देउ नका. त्याच्या घृणास्पद कृत्याबद्दल त्याला तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत खितपत पडू द्या. मुलांना शिकवण्याचे सकारात्मक काम त्याला द्या आणि सकाळ संध्याकाळ त्याला स्वच्छतागृह साफ़ करायला लावा.
-खुशवंतसिंग

देशाच्या संसदेवर हल्ला करणा-या गुन्हेगारा बद्दल जर लोक सहानुभुती ठेवत असतील तर या देशातील लोकांएवढे मोठे षंढ अख्ख्या ब्रम्हांडात शोधूनही सापडणार नाहीत. कुठल्या प्रश्नाचे राजकारण करावे व कुठल्याचे करु नये हे ही न समजण्याएवढे बाळबोध पक्ष व त्यांचे पक्षश्रेष्ठी या देशात असतील, तर इथल्या लोकशाही एवढा फ़ार्स अख्ख्या जगात कुठेही शोधून सापडणार नाही.

जेव्हा संसदेसारख्या अतिमहत्वपुर्ण वास्तूवर हल्ला होतो, तेव्हा तो हल्ला एखाद्या वास्तुवर वा व्यक्तीवर नव्हे तर त्या देशाच्या अस्मितेवर झालेला हल्ला असतो. अश्यावेळी मतांच्या भिकेकडे लक्ष न घालता न्यायव्यवस्थेच्या मदतीने संबंधीत अपराध्यांना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा देणे हा सरकारचा एकमेव उद्देश असला पाहिजे.

आधीच डोळ्याला काळी पट्टी बांधून हातात न्यायदानाचा तराजू घेतलेल्या न्यायदेवतेकडून कठोर शिक्षा मिळणे हे एक कठीण काम होवून बसले आहे. कायद्यात वाटांपेक्षा पळवाटाच जास्त आहेत. त्यातूनही जर एखाद्याला फ़ाशीसारखी कठोर शिक्षा झालीच, तर मानवी हक्क संघटना आणि राजकीय स्वार्थ साधणा-या व्यक्ती त्या निर्णयावर हरकत घेतात. त्यापुर्वी आपण ज्याचा बचाव करत आहोत ती व्यक्ती जगण्याच्या लायक तरी आहे का हा विचार ते करत नसावेत असे वाटते. मग एका अजाण बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करणारी 'धनंजय' नावाची दुष्टप्रवृत्ती असो वा अजाण निष्पाप बालकांचा बळी देणा-या 'गावित भगिनी' असोत वा देशाच्या संसदेवर बॉंबहल्ला करून अनेक सुरक्षा रक्षकांचा हल्ला करणारा अफजल सारखा अतिरेकी असो, या स्वार्थलोलुप व्यक्तींना त्याबद्दल काहीच नसते.

महात्मा गांधींची शिकवणूक आठवणा-या याच लोकांना गांधीजींचा 'सत्य-आग्रह' हा विचार तरी माहिती आहे का हे विचारण्याची वेळ आलेली आहे. ह्या प्रसंगी शांततेचा आग्रह धरणे म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देणेच होय. तुम्ही कितीही हैदोस घाला, कितीही लोकांचे जीव घ्या, ह्या देशात तुम्हाला होवु शकणारी मोठ्यात मोठी शिक्षा म्हणजे 'लहान मुलांना शिकवणे!'. जो मनुष्य बॉंबहल्ले करतो तो लहान मुलांना महात्मा गांधी, भगवान बुद्ध, महावीर यांचे विचार शिकवेल व समाजात सलोखा निर्माण करेल असे खुशवंतसिंगांना वाटत असेल तर त्यांना दिवा-स्वप्न पाहण्याची सवय लागली असावी असे दिसते. या कैद्यांना तुरुंगात ठेवल्यानंतर ते तिथे खितपत रहात नाहीत. त्यांचे साथीदार आपल्या देशाची विमाने अपहृत करून त्यातील लोकांच्या जीवाच्या बदल्यात ह्या साथीदारांना सोडवून घेउन जातात हे कंदाहार विमान अपहरणाच्या वेळी आपण अनुभवलेच आहे. या उप्परही आपण शहाणे होणार नसू तर मरेपर्यंत सापाला साप न म्हणता दोरीच म्हणणा-या मुर्खासारखी आपली अवस्था होइल.

संसदेच्या संरक्षणार्थ आपले जीवन अर्पण केलेल्यांच्या आई-वडिलांचे हुंदके, त्यांच्या जीवनसाथींच्या भग्न मनांतून निघणारे आक्रोश, लहान मुलांनी फ़ोडलेले टाहो हे सर्व आवाज जर या देशाच्या आंधळ्या न्यायदेवतेच्या कानापर्यंत पोचत नसतील व या गुन्हेगारांना केवळ सत्तेच्या दडपणामुळे शासन देणे हिला जमत नसेल तर ही न्यायव्यदेवता केवळ आंधळी वा बहिरीच नाही, तर संपूर्ण पांगळी झाली आहे असे नमूद करावे लागेल.

10.07.2006

जगात कुत्रा या प्राण्याला किती किंमत आहे? आज अचानक असा विचार मनात का प्रकट व्हावा? वर्तमानपत्रात पहिल्या पानावर बातमी यावी इतकी किम्मत आहे कुत्र्यांना?नाही नाही ... मला कुत्रा चावलेला नाही! बातमीच तशी आहे!

"मुंबईत पाच लाख भटके कुत्रे असल्याचा प्रशासनाचा दावा!"

वर वर दिसायला बातमी साधीच आहे. पण या बातमीमुळे काय काय होवु शकते याची कधी कल्पना केलीय?

पहिली गोष्ट म्हणजे हा पाच लाख आकडा कितपत खरा मानायचा? सरकार दफ़्तरी प्रत्येक गोष्ट कमी कमी करून सांगतात. म्हणजे पुरात १०० कोटींच नुकसान झाल असेल तर सांगायच १० कोटींचच झालय म्हणून! साहेब प्रत्यक्षात संध्याकाळी ८ ला येणार असले तरी सांगायच दुपारी १ लाच येणारेत म्हणून! (आपण आपले ताटकळणा-या लोकांनी साहेबांना घातलेल्या शिव्यांचे एक छान टीपण तयार करायचे!) त्यामुळे हा पाच लाखाचा आकडा म्हणजे "मतदानात पक्षाच कोणी एक लाख मतांनी हारल तरी हजार मतांचाच फ़रक पडला हो" म्हणण्यातला तर प्रकार नाही ना अशी कुजबूज सध्या सुरु आहे. परंतु दुसरीकडे अशीही आवई उठलीय की 'अधीकृत सुत्रांनी(हे कोण असतात?)' पत्रकार परिषदेत जाहीरपणे हा आकडा योग्य असून हा मुंबईतील 'चतुष्पाद वर्गात मोडणा-या श्वान जमातीचा असून धर्मेंद्र्च्या "कुत्ते-कमीने" मधील "कुत्ते" वर्गात मोडणा-या लोकांचा यात समावेश नाही' असे घोषीत केले आहे.

आतल्या गोटातून (हे कोण असतात?) अशीही एक बातमी कळलीय की विरोधी पक्ष या अहवालातील 'भटक्या' या शब्दावर आक्षेप घेणार असून कुत्र्यांच्या सामाजीक जिवनात विषमता पसरवण्याचा सरकारचा हा कुटील प्रयत्न हाणून पाडण्याचा त्यांचा इरादा आहे! त्यांनी त्यासाठी "कुत्रा तो कुत्रा ... मग तो वर्सोव्यातल्या झोपडपट्टीतला असो वा मलबार हीलवरचा!" , "'भटके' म्हणून अवहेलना करण्यात आलेल्या कुत्र्यांना त्यांचा न्याय्य हक्क ( म्हणजे एक मालक ) मिळालाच पाहिजे!" अश्या आशयाचे कापडी फ़लक तयार करण्याची 'ऑर्डर' दिल्याची कुणकूण आहे.

'कम्युनीस्टांनी' ( हे कोण असतात? ;-) )तर या प्रश्नावर सरकारला धारेवर धरलय! त्यांच्या मते कुत्र्यांच्या या भरमसाठ लोकसंख्यमागे बहुराष्ट्रीय औषध विक्रेत्या कंपन्यांचा हात असून आपली 'रॅबीज' रोगावरील औषधे विकली जावीत म्हणून ते हे कुत्रे वापरतात. त्यामुळे कुठल्याही कुत्र्यानी वा कुत्रा चावलेल्या इसमानी या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पुरवलेली औषधे घेउ नयेत असे जाहीर आवाहन त्यांच्यामार्फ़त करण्यात आले आहे!

तिकडे मनेका गांधी ने सरकारने जाहीर केलेले आकडे ऐकून समाधान व्यक्त केले आहे. कुत्रे हे मानवाचे मित्र असून 'लहान मुले चावल्यावर तुम्ही त्यांचे गालगुच्चे घेउन "पॉलत नाही न कॉरनार अश? शहानी पोग्गी आहे की नाही माझी शोनुली?" अस म्हणता न? मग कुत्रा चावल्यावरच त्रागा का करता?' असा जाहीर सवाल केलाय! कुत्र्यांना बदनाम करणा-या हिंदी चित्रपटांविरुद्ध कारवाईची मागणी त्या करणार असल्याचे समजले.

सध्या गांधीगिरीचे फ़ॅड जरा वाढलेले असल्याने महाराष्ट्र सरकारला सादर करण्यात आलेला एक महत्वाचा व्यापार विषयक अहवाल गांधीजींच्या तसबिरीमागे दडवून ठेवण्यात आलेला असल्याचे नुकतेच 'ऑपरेशन भू-भू' चे प्रणेते श्री. मांजरमारे यांनी जाहीर केले. त्या अहवालात एवढे महत्वाचे काय होते असे विचारले असता 'मुंबईतील कुत्र्यांना नागालॅंड मध्ये निर्यात करण्याचा ठराव त्यात मांडण्यात आला होता" असेही कळले.

परवा माझ्या एका 'कुत्रा गाडीसमोर येउन मोटारसायकलस्वाराला अपघात, स्वाराचे पुढचे दोन दात तुटले!' या बातमीमुळे वर्तमानपत्रात चमकलेल्या माझ्या मोटारसायकलस्वार मित्राला ही पाच लाख कुत्र्यांची बातमी दाखवली. आणि काल संध्याकाळी तो मला मुंबईला जाणा-या इंद्रायणी एक्स्प्रेस मध्ये भेटला. पहिले "सहजच .. जरा काम आहे" असे सांगुन मला टाळल्यावर शेवटी अधीक खोदून खोदून विचारले असता त्याने "वैयक्तीक आकसापोटी कुत्र्यांवर विषप्रयोग करायला" जात असल्याचे कबूल केले!

मी त्या मित्राला शुभेच्छा देतानाच ठरवून टाकलय, उद्या या प्रयत्नांत रॅबीज होवून माझा मित्र 'शहीद' झाला तर मी धर्मेंद्रला त्याच्या घरी जाउन सांगेन, 'कुत्ते ... चून चून के मारुंगा ... चून चून के ..." हे तुझ वाक्य माझा मित्र अक्षरश: जगला होता म्हणून....